यवतमाळमध्ये खळबळ! सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध चौकशीची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
यवतमाळ | प्रतिनिधी : यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योग मार्गदर्शन विभागातील अधिकारी श्रीमती सीमा रामदास खीरोडकर यांच्या विरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना आवश्यक चौकशी करण्याबाबत पत्र पाठविले आहे.
तक्रारदार उत्तम गणपत वानखेडे (रा. राजे संभाजी नगर, उमरखेड, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी मोबाईल फोनच्या माध्यमातून त्यांच्याविषयी आक्षेपार्ह स्वरूपाचा मजकूर रेकॉर्ड करून प्रसारित केल्याचा आरोप केला आहे. या कथित प्रकारामुळे आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याचा दावा तक्रारदारांनी केला असून, संबंधितांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 (Information Technology Act, 2000) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलीस अधीक्षकांना प्रकरणाची सखोल चौकशी करून कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत पत्र पाठविले असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध अशा स्वरूपाची तक्रार समोर आल्याने जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या प्रकरणातील आरोप अद्याप सिद्ध झालेले नसून संबंधित यंत्रणेकडून चौकशी सुरू होणे अपेक्षित आहे. चौकशी अहवालानंतरच पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय होणार आहे.
आता या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.



No comments:
Post a Comment