शेतकऱ्यांच्या शेतातील बकऱ्या चोरी करणारी टोळी जेरबंद; चार गुन्हे उघडकीस
यवतमाळ : वणी शहर व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत चोरीतील रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एक आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी परिसरातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना बकऱ्या चोरी प्रकरणातील आरोपी जामा मैदान परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सीताराम आसाराम शिंदे (वय २४), सुनील रामप्रसाद सांखळे (वय २७) आणि संजय राजू वायकर (वय २३, सर्व रा. बोरगाव, वणी) यांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी वणी पोलीस ठाण्यात दाखल बकरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच २०२४ ते २०२६ दरम्यान वणीसह इतर भागातील बकरी चोरीचे आणखी तीन गुन्हे केल्याचेही उघड झाले. आरोपी चोरी केलेल्या बकऱ्या विविध आठवडी बाजारात विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपी सुनील सांखळे याच्याकडून बकऱ्यांच्या विक्रीतील ७० हजार रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरलेले टाटा कंपनीचे पिकअप वाहन (क्रमांक MH-29-BE-8012) जप्त केले. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ३ लाख १० हजार रुपये असून एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या आरोपींनी पोलीस ठाणे परवा येथील अपराध क्रमांक ०३/२०२६ तसेच वडकी पोलीस ठाण्यातील अपराध क्रमांक ४८६/२०२४ आणि ६६२/२०२४ मधील गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे. या गुन्ह्यातील आरोपी सचिन वायकर हा फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्ता पेंढकर, पोउनि धनराज धोके, पोहेवा सुनील रंडोंगे, सुधीर गेडे, सुधीर पिंजुरकर, पोका सलमान शेख व चालक पोहेवा गणेश राऊत यांनी केली.


No comments:
Post a Comment