महागाव तालुक्यात वीजपुरवठा खंडित; Jio नेटवर्क सेवा ठप्प, नागरिक त्रस्त
महागाव, (प्रतिनिधी : शेख नूर शेख हैदर) : महागाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे Jio मोबाईल नेटवर्क सेवाही विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांत नेटवर्क पूर्णपणे गायब झाले असून मोबाईल कॉल, इंटरनेट सेवा आणि ऑनलाइन व्यवहार ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने मोबाईल टॉवरच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. परिणामी Jio ग्राहकांना कॉल लागत नसणे, कॉल मध्येच खंडित होणे, इंटरनेटचा अत्यंत कमी वेग मिळणे किंवा नेटवर्क उपलब्ध नसणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच ऑनलाइन सेवांवर अवलंबून असलेल्या नागरिकांना बसत आहे. शैक्षणिक उपक्रम, शासकीय ऑनलाइन सेवा, बँकिंग व्यवहार आणि डिजिटल पेमेंट यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांनी संबंधित कंपनीकडे तसेच प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही समस्या कायम असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच मोबाईल नेटवर्क सेवा अखंडित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, वाढत्या तांत्रिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून समस्या मार्गी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


No comments:
Post a Comment