आराध्या आडेची थॅलेसेमियाविरुद्धची यशस्वी लढाई
लोक विधान/यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील थॅलेसेमिया आणि सिकलसेल रुग्णांसाठी निस्वार्थ सेवा फाउंडेशन सातत्याने कार्यरत असून, प्रत्येक रुग्णाला मोफत रक्त उपलब्ध करून देण्यासाठी संस्था अथक प्रयत्न करत आहे. रुग्णांना रक्तासाठी भटकंती करावी लागू नये, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
परंतु केवळ रक्तदान हा उपचाराचा पूर्ण पर्याय नसल्याची जाणीव ठेवून, दीर्घकालीन उपाययोजना आणि रुग्णांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा या हेतूने निस्वार्थ सेवा फाउंडेशनचे सचिव परशुराम कडू यांनी मुंबई येथील रिलायन्स हॉस्पिटलच्या प्रख्यात हेमॅटोलॉजिस्ट डॉ. श्वेता बंसल यांच्याशी संपर्क साधून HLA टेस्टिंग कॅम्प आयोजित करण्याची विनंती केली.
डॉ. श्वेता बंसल आणि त्यांच्या टीमने सकारात्मक प्रतिसाद देत यवतमाळ येथे दोन दिवसांचा HLA टेस्टिंग कॅम्प आयोजित केला. या कॅम्पमध्ये तब्बल 150 थॅलेसेमिया रुग्णांची तपासणी करण्यात आली. काही महिन्यांनंतर आलेल्या अहवालांमध्ये 4 रुग्णांना त्यांच्या भावंडांशी 12/12 HLA मॅच मिळाल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे त्यांच्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा मार्ग मोकळा झाला.
यापैकी आराध्या आडे हिची पहिल्या ट्रान्सप्लांटसाठी निवड करण्यात आली. परशुराम कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आराध्याला 21 दिवसांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिचे प्री-ट्रान्सप्लांट उपचार आणि आवश्यक औषधोपचार पूर्ण करण्यात आले. सर्व वैद्यकीय तपासण्या, विशेषतः प्लीहा (spleen) स्थिती स्थिर असल्याची खात्री झाल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी मुंबई येथील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
या संपूर्ण कालावधीत परशुराम कडू यांनी आराध्या व तिच्या पालकांचे सतत समुपदेशन (counselling) केले तसेच डॉक्टरांशी नियमित फॉलो-अप ठेवत उपचार प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मानसिक आधारामुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
डॉ. श्वेता बंसल यांनी आराध्याच्या लहान भावाच्या स्टेम सेल्सच्या सहाय्याने यशस्वी बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले. विशेष म्हणजे या संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च रिलायन्स हॉस्पिटल ट्रस्टने उचलला.
ही यशोगाथा निस्वार्थ सेवा फाउंडेशनच्या निस्वार्थ कार्याची आणि परशुराम कडू यांच्या समर्पित प्रयत्नांची साक्ष देते. आज आराध्याची कथा अनेक थॅलेसेमिया रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली असून, योग्य उपचार, समर्पण आणि सहकार्याच्या जोरावर या आजारावर मात करता येते, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.
थॅलेसेमिया हा आजार फक्त रक्त देऊन पूर्णपणे बरा होत नाही, तर त्यासाठी योग्य मार्गदर्शन, वेळेवर तपासण्या आणि दीर्घकालीन उपचारांची गरज असते. प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळाले, तर त्यांचे आयुष्य नक्कीच बदलू शकते. आराध्यासारख्या रुग्णांची यशोगाथा ही इतर कुटुंबांसाठी आशेचा किरण आहे. आम्ही प्रत्येक थॅलेसेमिया रुग्णापर्यंत हीच आशा आणि मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू.
परशुराम कडू (सचिव)निस्वार्थ सेवा फाऊंडेशन


No comments:
Post a Comment