कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ६३ गोवंश प्राण्यांची पोलिसांनी केली सुटका; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवैध गोवंश तस्करीविरोधात जोरदार मोहीम उघडली असून, अवघ्या २४ तासांत कळंब, महागाव आणि पांढरकवडा या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडाकेबाज कारवाया करत कत्तलीसाठी क्रूरपणे बांधून ठेवलेल्या एकूण ६३ गोवंश प्राण्यांची यशस्वी सुटका केली आहे. कळंब पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी चक्रवती नदीकाठी आणि बासुरिवाले बाबा दर्ग्याजवळ छापेमारी करून विना अन्नपाणी निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या २८ गोवंश प्राण्यांना ताब्यात घेऊन गोसेवा संवर्धन ट्रस्टकडे सोपवले आहे. त्याचप्रमाणे, महागाव पोलिसांनी ग्राम बाकोडी येथील कब्रस्तान परिसरात छापा टाकून ७ गोवंश प्राण्यांची सुटका करत शेख रजीक शेख युनुस या आरोपीला अटक केली आहे.
दुसरीकडे, पांढरकवडा पोलिसांनी पाटनबोरी ते मांडवी रोडवर मोठी कारवाई करत तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेले जाणारे २८ गोवंश प्राणी आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे ३ लाख रुपयांचे पिकअप वाहन जप्त केले असून, याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या या एकाच कालावधीत केलेल्या तिन्ही कारवायांमध्ये जनावरांची किंमत आणि जप्त वाहनासह सुमारे १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात आणि स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस पथकांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली असून, आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे.


No comments:
Post a Comment